
नेवासा – आपत्तीच्या काळात मदतीसाठी पुढे जाणाऱ्या कार्यकर्त्यांना योग्य तांत्रिक प्रशिक्षण मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे कार्य सेवाभारती संस्था प्रभावीपणे पार पाडत असून ते स्तुत्य आहे, असे प्रतिपादन श्रीक्षेत्र देवगडचे महंत हरिभक्त परायण श्री भास्करगिरी महाराज यांनी केले.

“सेवाभारती उत्तर अहिल्यानगर जिल्हा” यांच्या वतीने आयोजित आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नेवासा येथील नायब तहसीलदार श्री चिंतामण संदीप यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणात उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील १६० प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला. त्यांना पूरस्थिती, आग, अपघात अशा आपत्तींच्या प्रसंगी सर्वसामान्यांना तात्काळ आणि प्रभावी मदत कशी करावी याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण सिव्हिल डिफेन्सचे जवान श्रीकृष्ण पाटील, प्रमोद मोरे व डॉ. गणेश गवळी (पुणे) यांनी दिले. आगामी नाशिक कुंभमेळा यासारख्या मोठ्या सोहळ्यांमध्ये हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार असल्याचेही सांगण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सेवाभारती उत्तर नगर जिल्ह्याचे अध्यक्ष जितेंद्र शेळके, उपाध्यक्ष अजित पारख, सचिव वैभव धुमाळ, सहसचिव सौ. कावेरी मापारी, कोषाध्यक्ष चेतन पटेल तसेच अन्य पदाधिकारी यांनी प्रयत्न केले. तसेच प्रांतसचिव प्रदीप सबनीस व पराग थोरात यांची उपस्थिती होती.

संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र प्रांतासाठी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन सेवाभारती पश्चिम महाराष्ट्र प्रांत सामाजिक आयाम व आपत्ती व्यवस्थापन प्रमुख सदानंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या अंतर्गत १७ जिल्ह्यांमध्ये आयोजित शिबिरांद्वारे अंदाजे २३०० तरुणांशी संपर्क साधण्यात आला असून प्रत्यक्ष १८०० युवक-युवतींनी प्रशिक्षणात सहभाग नोंदविला आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.