राकेश खेडेकरने आपल्या पत्नीची चाकूने वार करून हत्या केली आणि तिला सुटकेसमध्ये भरलं आणि तो सुटकेस बाथरूममध्ये टाकून तो घराबाहेर पडला.
घरगुती वादातून पतीनेच पत्नीचा चाकूने सपासप वार करत खून केल्याची घटना बंगळुरूत घडली. 26 मार्च रोजी बेंगळुरूमध्ये मुंबईतून बंगळुरूत वास्तव्यास गेलेल्या राकेश खेडेकरने आपल्या पत्नीची चाकूने वार करून हत्या केली आणि तिला सुटकेसमध्ये भरलं आणि तो सुटकेस बाथरूममध्ये टाकून तो घराबाहेर पडला. मात्र, त्याने जेव्हा पत्नीवर वार केले तेव्हा ती खाली पडल्यावरती त्याला तीचा मृत्यू झाला असं वाटलं होत. पण, राकेश खेडेकर याने पत्नी गौरी अनिल सांबरेकर हिच्यावर चाकूने वार करून तिला जिवंत सुटकेसमध्ये भरल्याची माहिती आता समोर आली आहे.
फॉरेन्सिक तपासणीत सूटकेसमध्ये मोठ्या प्रमाणात बलगम (लाळेसारखा पदार्थ) आढळून आला. जेव्हा व्यक्ती जिवंत असते तेव्हाच बलगम बाहेर पडतो. फॉरेन्सिक टीमने दिलेल्या माहितीनुसार, गौरीचा मृत्यू सूटकेसमध्ये झाला. तिच्या शरीरावरही मोठ्या प्रमाणावर जखमांच्या खुणा होत्या. पत्नीची हत्या करून राकेश जोगेश्वरीकडे आपल्या घरी येण्यासाठी निघाला होता. तेथे पत्नीच्या भावाला फोन करून त्याने हत्येची माहिती दिली होती.

या दोघांनी घरच्यांच्या इच्छेविरुद्ध प्रेमविवाह केला होता. राकेश आणि गौरी हे महाराष्ट्रातील जोगेश्वरी येथील रहिवासी होते. गौरी ही राकेशच्या आत्याची मुलगी होती. राकेशच्या घरी राहूनच तिने शिक्षण घेतले. यादरम्यान दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. ते चार वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्येही होते. दोन वर्षांपूर्वी घरच्यांच्या इच्छेविरुद्ध त्याचे लग्न झाले.
आई-वडिलांसोबतच्या मतभेदांमुळे दोघेही महिनाभरापूर्वी मुंबईहून बंगळुरूला शिफ्ट झाले. यानंतर गौरीने राकेशला नवीन शहरात आणून नोकरी न मिळाल्याचा दोष द्यायला सुरुवात केली. राकेश बेंगळुरूमध्ये एका टेक फर्ममध्ये काम करत होता, तर गौरी नोकरीच्या शोधात होती. राकेश आणि गौरी यांच्यात किरकोळ भांडण झाले. 26 मार्च रोजी राकेश आणि गौरी यांच्यात भांडण झाले होते. राकेशने गौरीला कानाखाली मारली. त्यानंतर गौरीने त्याच्यावर चाकू फेकला, त्यात तो किरकोळ जखमी झाली. यानंतर राकेशने रागाच्या भरात पत्नीच्या मानेवर दोनदा तर पोटावर एकाच चाकूने दोन वार केले.
यानंतर राकेशने गौरीला मृत समजून तिला ट्रॉली बॅगमध्ये भरलं. त्याने बॅग सोबत नेण्याचा प्रयत्न केला, मात्र सुटकेसचे हँडल तुटले. त्यानंतर राकेशने सुटकेस बाथरूममध्ये सोडली आणि फरशीवरून रक्त साफ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर घराला बाहेरून कुलूप लावून रात्री उशिरा राकेश आपल्या होंडा सिटी कारमधून जोगेश्वरीसाठी निघाला.

राकेशने शेजाऱ्यांना सांगितले की, गौरीने आत्महत्या केली. राकेशला आई-वडिलांना भेटण्यासाठी मुंबईला जायचे होते. शहर सोडण्यापूर्वी त्याने आपला फोन बंद केला. पुण्याच्या जवळ असताना त्याने फोन ऑन केला आणि गौरीच्या भावाला त्याने गौरीची हत्या केल्याचे सांगितले. याबाबत गौरीच्या भावाने महाराष्ट्र पोलिसांना माहिती दिली. त्यांनी बेंगळुरू पोलिसांशी बोलून राकेशच्या घरी जाऊन माहिती घेण्यास सांगितले. दरम्यान, राकेशने इमारतीतील दुसरे भाडेकरू प्रभू सिंग यांना फोन करून पत्नी गौरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं सांगितलं होतं. राकेशने प्रभू सिंग यांना घरमालक आणि पोलिसांना कळवायला सांगितलं होतं. पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना गौरीचा मृतदेह बाथरूममध्ये सुटकेसमध्ये आढळून आला.

राकेशला 27 मार्च रोजी सायंकाळी पुण्याच्या जवळ असलेल्या शिरवळ या ठिकाणी त्याने कारमध्ये फिनाईल आणि झुरळ मारण्याचं औषध पिऊन आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. पण तो बेशुध्द अवस्थेत असताना स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली त्यानंतर त्याला स्थानिक रूग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं त्यानंतर त्याला पुण्यातील ससून रूग्णालयात आणण्यात आलं. तो वारंवार पत्नीकडे जाण्याबाबत बोलत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो मानसिक अस्वस्थतेचे नाटक करत होता. पण तो पूर्णपणे बरा आहे आणि सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करत होता. गौरीची हत्या केल्यानंतर स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे राकेशने पोलिसांना सांगितले. त्याने झुरळ मारण्यासाठी वापरले जाणारे केमिकल आणि फिनाईल यांचे सेवन केले होते.

गौरी अन् राकेशचं शेवटचं भांडण कशावरून?
घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश राजेंद्र खेडेकर (वय 35, रा. जोगेश्वरी मुंबई) हा फेब्रुवारी महिन्यात मुंबईहून आपली पत्नी गौरी (वय 32) हिच्यासह बेंगळुरु येथील बनारगट्टा तेजस्विनीनगर येथे राहण्यास आला. राकेश वर्क फ्रॉम होम करत होता, तर त्याची पत्नी गौरी जॉब शोधत होती. 26 मार्च 2025 च्या रात्री राकेशकडे गौरीने पुन्हा मुंबईला जाण्याचा आग्रह धरला. या कारणाने त्यांच्यात वाद झाला. गौरी यावेळी घरातील भांडी आपटू लागली. तेव्हा राकेशने आपण राहतो त्या घराचं डिपॉझिट भरलेलं आहे. आपण घर सोडलं, तर डिपॉझिटचे पैसे मिळणार नाहीत, येथे येण्यासाठी खूप खर्च झाला आहे, असं तिला समजवण्याचा प्रयत्न केला, पण वाद विकोपाला गेला, गौरीने त्याला चाकूने भीती दाखवली. त्यावेळी त्याचा संताप अनावर झाला अन् त्याने तिच्या हातातील चाकू घेऊन तिच्यावरतीच वार केले, यामध्ये तिचा मृत्यू झाला.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.