
नेवासा – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद), तालुका व्यवस्थापन कक्ष आणि आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने परिस्मयला प्रभाग संघ, भानसहिवरा (ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात महिला सक्षमीकरण, बचत गटांची आर्थिक प्रगती आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी ५० लाख रुपयांच्या सीआयएफ निधीचे धनादेश महिला बचत गटांना वितरित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. रत्नमाला विठ्ठलराव लंघे पाटील या होत्या. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार विठ्ठलराव लंघे पाटील म्हणाले की, “नेवासा तालुक्याचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय असून त्यात महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. महिला पुरुषांच्या तुलनेत दोन पावले पुढे जाऊन जबाबदारीने काम करतात, याचा मला अभिमान आहे. राज्य व केंद्र सरकार महिला सक्षमीकरणासाठी कटिबद्ध असून बचत गटांच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.”

ते पुढे म्हणाले की, “तालुक्यात सध्या बचत गटांचे जाळे अधिक मजबूत होत असून आगामी काळात २,४०० ते २,५०० बचत गटांची स्थापना करण्याचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक महिला स्वतःच्या पायावर उभी राहावी यासाठी उमेद अभियान, तालुक्यातील अधिकारी आणि विविध मार्गदर्शन केंद्रांमार्फत सातत्याने मदत केली जात आहे. ठिकठिकाणी बचत गटांसाठी कार्यालये उपलब्ध झाली असून आणखी कार्यालये सुरू करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.”

महिलांनी राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असे आवाहन करताना आमदार लंघे म्हणाले की, “लाडक्या बहिणींचा विश्वास, संत-महंतांचे आशीर्वाद, गोरगरीब जनतेचे प्रेम आणि तरुणांची साथ यामुळेच माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता आमदार होऊ शकला. गेल्या अडीच वर्षांपासून सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून विकासाची वाटचाल सुरू आहे.”

अध्यक्षीय भाषणात सौ. रत्नमाला विठ्ठलराव लंघे पाटील यांनी महिलांच्या प्रश्नांसाठी लंघे कुटुंबाचे दार कायम खुले राहील, अशी ग्वाही दिली. महिला बचत गटांचे प्रश्न, महिला सक्षमीकरण आणि स्वावलंबनासाठी आपण आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असून भविष्यातही ही भूमिका कायम राहील, असे त्यांनी सांगितले. बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी स्वतःबरोबरच आपल्या मुलांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आर्थिक सक्षमतेचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी गटविकास अधिकारी संजय लखवाल, प्रताप चिंधे, ॲड. रामेश्वर सुरुंग यांनीही मनोगत व्यक्त करून महिला बचत गटांच्या कार्याचे कौतुक केले व मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, सौ. रत्नमाला लंघे पाटील, प्रताप चिंधे, किशोर जोजार, ॲड. विश्वासराव काळे, देविदास साळुंके, लक्ष्मण मोहिते, अंकुश काळे, मीना जोरदार, डॉ. मनीषा वाघ, भारतीताई बेंद्रे, गटविकास अधिकारी संजय लखवाल, नायब तहसीलदार संदीप चिंतामण, तालुका अभियान व्यवस्थापक अर्जुन सोनवणे, प्रभाग समन्वयक विलास राठोड, राजेंद्र निंबाळकर, रवींद्र काळे, तालुका व्यवस्थापक ऐश्वर्या देशमुख यांच्यासह महिला बचत गटांच्या प्रतिनिधी, सीआरपी आणि हजारो महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सौ. मनीषा कैलास तनपुरे व सौ. निर्मला कांबळे यांनी स्वागतगीत सादर करून मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महिला बचत गटांच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







