देवगड फाटा : नेवासा तालुक्यातील गुरुदेव दत्त पीठ, श्री क्षेत्र देवगड येथे गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भक्तिमय सोहळ्यास महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो भाविकांनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शविली. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत श्री भगवान दत्तात्रय, श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा समाधी मंदिर तसेच देवस्थान परिसरातील विविध मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.
देवगड येथील ज्ञानसागर सभामंडपात संपन्न झालेल्या हरिकीर्तनात गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज म्हणाले की, श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या तपश्चर्येमुळे भगवान दत्तप्रभूंनी देवगड क्षेत्री वास्तव्य केले आहे. संतांनी मानवजातीच्या उद्धारासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले आहे. श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांनी अत्यंत साधे व सेवाभावी जीवन जगत मानवकल्याणासाठी गुरुदेव दत्त पीठाची निर्मिती केली. त्यांनी दिलेल्या विचारांचे व शिकवणीचे पालन करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.

आपली भारतीय संस्कृती, संस्कार आणि विचार यांचे जतन करणे ही काळाची गरज आहे. परकीय संस्कृतीच्या आहारी न जाता संतांच्या शिकवणीनुसार आचरण करणे आवश्यक आहे.
जेथे श्रद्धा असते तेथे गुरूकृपा लाभते. संत हे मानवाच्या जीवनातील भीती, दुःख आणि नैराश्य दूर करून जीवनाला योग्य दिशा देण्याचे कार्य करतात. असे प्रतिपादन त्यांनी केले.
गुरूंची भूमिका महत्त्वपूर्ण असून, ज्ञान, कौशल्य आणि योग्य मूल्यांचा वारसा गुरू आपल्या शिष्याला देत असतात, असे सांगत त्यांनी गुरू-शिष्य परंपरेचे महत्त्व विशद केले.

कीर्तनादरम्यान श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या आठवणींना उजाळा देताना गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज भावूक झाले. त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळलेले पाहून ज्ञानसागर सभामंडपातील हजारो भाविकांच्याही डोळ्यांच्या कडा ओलावल्या. गुरू-शिष्याच्या पवित्र नात्याचा हा भावनिक क्षण उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला.
गुरुपौर्णिमेनिमित्त विविध भागांतून अनेक पायी दिंड्या श्री क्षेत्र देवगड येथे दाखल झाल्या होत्या. या सर्व दिंड्यांचे देवस्थानच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. देवस्थानच्या वतीने श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा समाधी मंदिर, श्री दत्त मंदिर परिसर तसेच दर्शनबारीची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती
दिवसभर लाखो भाविकांनी दर्शन घेऊन गुरुकृपेचा लाभ घेतला.
गुरुपौर्णिमेनिमित्त उपस्थित भाविकांसाठी गंगापूर येथील विजयकुमार सोमाणी, प्रवीणकुमार सोमाणी, अशोककुमार सोमाणी व अनिलकुमार सोमाणी परिवाराच्या वतीने भंडारा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर भाविकांना अन्नदान करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज तसेच देवस्थानचे उत्तराधिकारी स्वामी श्री प्रकाशानंदगिरीजी महाराज यांचे संतपूजन करून आशीर्वाद घेतले.
या कीर्तन प्रसंगी प्रसंगी देवस्थानचे उत्तराधिकारी स्वामी श्री प्रकाशानंदगिरीजी महाराज, डॉ. जनार्दन महाराज मेटे, दिनकर महाराज मते, आमदार विठ्ठलराव लंघे, मुळा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, नामदेव महाराज कंधारकर, बाळू महाराज कानडे, बजरंग विधाते, सौ. रत्नमाला विठ्ठलराव लंघे, जिल्हा परिषद सदस्या दीपा सचिन मुदंडा, संतोष माने, यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर व हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गुरुपौर्णिमा सोहळ्यानिमित्त नेवासा पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक प्रताब दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली देवगड परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे दिवसभर भाविकांची मोठी गर्दी असूनही कुठेही वाहतूक कोंडी अथवा कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

गुरुस्मरणाने ओलावले भाविकांचे डोळे
श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या आठवणींना उजाळा देत असताना गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज यांचा कंठ दाटून आला आणि त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. गुरूंच्या चरणी असलेली अखंड निष्ठा, श्रद्धा आणि समर्पणभाव व्यक्त होताच ज्ञानसागर सभामंडपातील हजारो भाविकांच्याही डोळ्यांच्या कडा ओलावल्या.. गुरू-शिष्याच्या पवित्र, अतूट आणि दिव्य नात्याचा साक्षात्कार घडविणारा हा भावस्पर्शी क्षण उपस्थित भाविकांच्या कायम स्मरणात राहणारा ठरला.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







