
नेवासा – एप्रिल महिन्यापासूनच सुरू झालेल्या कडक उन्हामुळे प्रवरानदी पात्रातील बंधारे कोरडे पडू लागले असून, शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर, नेवासा तालुक्यातील बंधाऱ्यांमध्ये तातडीने पाणी सोडण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष मनोज अंबादास पारखे यांनी जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

उन्हाची तीव्रता अधिक असल्याने नदीपात्रातील पाण्याचे वेगाने बाष्पीभवन झाले आहे. यामुळे पानगाव, पुनतगाव, पाचेगाव आणि मद्यमेश्वर येथील बंधारे तळ गाठू लागल्याने परिसरातील उभ्या पिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. केवळ शेतीच नव्हे, तर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि नदीकाठच्या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींच्या पाणीपातळीत झालेली मोठी घट यामुळे नागरिक हवालदिल झाले असल्याचे पारखे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

भंडारदरा आणि निळवंडे धरणांत उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यातून नेवासा तालुक्यातील या बंधाऱ्यांना तात्काळ पाणी देऊन दिलासा द्यावा, अशी विनंती त्यांनी केली आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच निर्माण झालेल्या या पाणीसंकटावर प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी अपेक्षा आता तालुक्यातील जनतेकडून व्यक्त होत आहे.

या निवेदनावर भाजप शहराध्यक्ष मनोज पारखे यांच्यासह संजय गायके, सुनील व्यवहारे, पिंटू बोरकर, संभा काका पवार, बाळासाहेब कोकणे, सुनील हापसे, आदिनाथ पठारे, संजय गवळी, अविनाश जोशी, सुनील हारदे, राजेश कडू, अशोक टाके, संजय लोखंडे, तानाजी गायकवाड यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







