नेवासा (प्रतिनिधी) – तालुक्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, बाधित पिकांचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सततच्या पावसामुळे गहू, कांदा, केळी, डाळिंब, टरबूज, पपई, हरभरा, भुईमूग यांसारख्या रब्बी पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः गव्हाची पिके भुईसपाट झाली असून कांद्याच्या पाथीत पाणी साचल्याने त्याची गुणवत्ता खालावली आहे. या नैसर्गिक आपत्तीतून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी प्रशासनाने तातडीने पंचनामे करून मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

यासोबतच 13 मार्च 2022 च्या परिपत्रकानुसार जलसंपदा विभागाकडून पाणीपट्टी वसुलीसाठी सक्तीची कारवाई सुरू असल्याबाबतही संघटनेने नाराजी व्यक्त केली. यावर्षी अतिवृष्टीमुळे शासनाने कर्जवसुली न करण्याचे आदेश दिले असताना, थकबाकीदार शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर शासन किंवा जलसंपदा विभागाचे नाव बोजा म्हणून नोंदवू नये, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून तसेच न्यायालयीन मार्गाने लढा उभारेल, असा इशाराही देण्यात आला आहे.

या निवेदनावेळी हरिभाऊ तुवर, मेजर अशोक काळे, तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब नागोडे, डॉ. रोहित कुलकर्णी, अॅड. ज्ञानेश्वर शिरसाट, अॅड. बाळासाहेब कावळे, दादासाहेब नाबदे, कैलास पवार, कार्लस साठे, बंडोपंत चौगुले, दत्तात्रय निकम, किरण लंघे, सोमनाथ औटी यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







