घोडेगाव प्रतिनिधी :
नेवासा तालुक्यातील चांदा भागातील अवैध उत्खननाच्या प्रकरणाने पुन्हा एकदा गंभीर वळण घेतले असून, सोनई पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आलेली वाहने कुणाच्या आदेशाने सोडण्यात आली, असा गंभीर आरोप समोर आल्यानंतर प्रशासन सतर्क झाले आहे. उपविभागीय अधिकारी, अहिल्यानगर यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, नेवासा तालुक्यातील चांदा परिसरातील गट क्रमांक ७४६ मध्ये दि. ४ मार्च २०२६ रोजी अवैध उत्खनन सुरू असताना कारवाई करण्यात आली होती. यावेळी जेसीबी (क्र. एमएच १७ सीई ४२४७) तसेच एक ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त करण्यात आली होती. ही कारवाई महसूल व पोलिस विभागाच्या संयुक्त पथकाने केली होती.
मात्र, या प्रकरणाबाबत अहिल्यानगर प्रांत अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आल्यानंतर गंभीर बाब समोर आली. तक्रारीत असा आरोप करण्यात आला आहे की, जप्त करण्यात आलेली वाहने पोलिसांनी परस्पर सोडून दिली. त्यामुळे कारवाईची विश्वासार्हता आणि प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणेला पत्र पाठवून पुढील बाबींची चौकशी करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत :
- जप्त वाहने कोणत्या परिस्थितीत सोडण्यात आली?
- त्यासाठी कोणती अधिकृत प्रक्रिया पार पाडण्यात आली होती का?
- संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात यावी.
तसेच, संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अहिल्यानगर परिसरात अवैध उत्खननाचे प्रकार नव्याने उघड होत नसले, तरी या प्रकरणात जप्त वाहने सोडल्याचा आरोप अत्यंत गंभीर मानला जात आहे. प्रशासनाच्या कारवाईनंतरही नियमभंग होत असेल, तर संबंधित यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव किंवा दबावाचे राजकारण असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
या घटनेमुळे पुढील काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होत आहेत :
- अवैध उत्खनन रोखण्यासाठी असलेली यंत्रणा कितपत प्रभावी आहे?
- जप्त केलेल्या मालमत्तेच्या सुरक्षिततेबाबत ठोस नियमांची अंमलबजावणी होते का?
- संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित होणार का?

स्थानिक नागरिकांमध्ये या प्रकरणामुळे नाराजी वाढत असून, पारदर्शक आणि कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. प्रशासनाने या प्रकरणात ठोस भूमिका घेतली नाही, तर अवैध उत्खननाला आणखी खतपाणी मिळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नेवासा तालुक्यातील चांदा येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या जमिनीत अवैध उत्खनन सुरू असताना या प्रकरणात नेवासा तहसीलदार यांची भूमिकाही संशयास्पद वाटत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. जप्त वाहने सोडण्यासाठी तहसीलदारांच्या वाहनचालकाने सोनई पोलीस ठाण्यात फोन करून संबंधित वाहने सोडण्यास सांगितल्याचा आरोप आहे. मात्र, याबाबत कोणताही लेखी आदेश देण्यात आला नसल्याचे सांगितले जात आहे. तोंडी आदेशावर वाहने कशी सोडण्यात आली? हा घोडेगावचा बाजार आहे का? असा सवालही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. एकूणच या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

जप्त केलेली वाहने सोडण्याचा कोणताही लेखी आदेश नसताना, सोनई पोलिसांनी तोंडी सूचनेवर वाहने कशी सोडली, याची चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे. तहसीलदारांचे वाहनचालक पोलिसांना फोन करून वाहने सोडण्यास सांगतात आणि त्याची अंमलबजावणी पोलिसांकडून केली जाते, त्यामुळे नेवासा तालुक्यात महसूल प्रशासनात नेमके काय सुरू आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







