माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या पुढाकारातून सोनईत जलसंवर्धनाला नवी दिशा
सोनई | संदिप दरंदले –सोनई गावाची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या कौतुकी नदीच्या स्वच्छता, संवर्धन आणि सुशोभीकरणासाठी यशवंत सामाजिक प्रतिष्ठान व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नदीपात्रातील गाळ काढणे, काटेरी झुडपे हटविणे, प्लास्टिक व इतर कचऱ्याची विल्हेवाट लावणे आणि नदीचा नैसर्गिक प्रवाह सुरळीत करणे यासाठी मोठ्या प्रमाणावर श्रमदान करण्यात येत आहे.

माजी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या पुढाकारातून तसेच ज्येष्ठ साहित्यिक व माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त यशवंत सामाजिक प्रतिष्ठानने या अभियानाची जबाबदारी स्वीकारली. या कामासाठी प्रतिष्ठानमार्फत तब्बल १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्यामुळे कौतुकी नदीच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर स्वच्छता आणि गाळ काढण्याची कामे हाती घेण्यात आली असून नदीचे रुपडेच पालटले आहे.
सोनईतील रामझिरा मंदिर परिसर, दशक्रिया विधी घाट, मारुती मंदिर परिसर, दरंदले अमरधाम परिसर, लांडेवाडी रोड परिसरातील दरंदले वस्ती आदी भागांमध्ये स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबविण्यात आले. ग्रामस्थ, युवक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत श्रमदानाद्वारे नदी संवर्धनात मोलाचे योगदान दिले.
कौतुकी नदी ही सोनईच्या पर्यावरणीय, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. नदीपात्रातील गाळ काढल्याने आणि स्वच्छता केल्याने परिसरातील भूजल पातळीत वाढ झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तसेच स्वच्छतेमुळे नदी परिसर अधिक आकर्षक, प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक बनत असल्याचेही नागरिकांनी सांगितले.

युवा नेते उदयन गडाख यांनी यापूर्वी मारुती मंदिर येथे झालेल्या बैठकीत नागरिकांना नदीमध्ये कचरा टाकू नये, असे आवाहन केले होते. विशेषतः हॉटेल, व्यापारी प्रतिष्ठाने व इतर व्यावसायिकांनी नदी प्रदूषित होणार नाही याची काळजी घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली होती.
माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या जलसंवर्धनविषयक धोरणातून यापूर्वीही नेवासा तालुक्यातील विविध गावांमध्ये नद्या व ओढ्यांवर बंधारे उभारण्यात आले आहेत. या उपक्रमांमुळे तालुक्यात जलसाठ्यात वाढ होऊन जलसंवर्धनाची व्यापक चळवळ निर्माण झाली. परिणामी नेवासा तालुका ‘सुजलाम सुफलाम’ करण्याच्या दिशेने महत्त्वाची वाटचाल करत असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे.

कौतुकी नदी स्वच्छता अभियानामुळे केवळ नदीचे सौंदर्य वाढत नसून पर्यावरण संरक्षण, जलसंवर्धन आणि सामाजिक सहभागाचे प्रभावी उदाहरणही निर्माण होत आहे. भविष्यातही ही मोहीम सातत्याने राबवून नदी परिसर अधिक स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
कचरा नदीत टाकू नका; घंटागाडीतच द्या::
“माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली कौतुकी नदी स्वच्छता अभियान सुरू आहे. सोनई गावातील व्यावसायिक व नागरिकांनी आपला ओला व सुका कचरा कौतुकी नदीमध्ये टाकू नये. ग्रामपंचायतीच्या घंटागाडीतच कचरा देऊन या अभियानाला सहकार्य करावे.”
— सविता अंबादास राऊत
माजी उपसरपंच, ग्रामपंचायत सोनई

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







