
नेवासा: आषाढी वारीनिमित्त संभाजीनगर–अहिल्यानगर महामार्गावरील माळीचिंचोरा येथे पंचगंगा उद्योग समूहाच्या वतीने गेल्या बारा वर्षांपासून सुरू असलेली वारकरी सेवेची परंपरा यंदाही उत्साहात सुरू आहे.

महामार्गावरून पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या सर्व दिंड्यांतील वारकऱ्यांना प्रेमाने बुंदीचे लाडू व केळी प्रसादाचे वाटप केले जात असून, गेल्या दोन दिवसांपासून हा उपक्रम अखंडपणे सुरू आहे. आज ग्रंथराज ज्ञानेश्वरी दिंडी सोहळ्यातील सर्व दिंड्यांनी या सेवा केंद्राला भेट दिली.

यावेळी ज्ञानेश्वर देवस्थानचे देविदास महाराज म्हस्के यांनी भेट देऊन या सेवाकार्याचे कौतुक केले.
पंचगंगा उद्योग समूहाचे विश्वस्त बाळासाहेब शिंदे आणि काकासाहेब शिंदे यांच्या हस्ते महाराज मंडळींचा सत्कार करण्यात आला आणी संतपूजनही करण्यात आले.

आज देवगडचे महंत भास्करगिरी महाराज यांनीही सेवा केंद्राला भेट देत, वारकऱ्यांसाठी निस्वार्थ भावनेने सुरू असलेल्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. सलग बारा वर्षे एक तप अखंडपणे ही सेवा सुरू ठेवल्याबद्दल त्यांनी पंचगंगा उद्योग समूहाचे अभिनंदन करून पुढील काळातही अशीच समाजसेवा सुरू ठेवण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यंदाच्या वारीसाठी सुमारे ४० हजार बुंदीचे लाडू तयार करण्यात आले असून, दररोज किमान अडीच हजार वारकऱ्यांना प्रसादाचे वाटप केले जात असल्याची माहिती पंचगंगाचे प्रमुख प्रभाकर काका शिंदे यांनी सांगितले.

वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठल सेवा मानून पंचगंगा उद्योग समूह हा उपक्रम दरवर्षी सातत्याने राबवत असून, वारकरी संप्रदायातून या सेवाकार्याचे मोठ्या प्रमाणावर स्वागत होत आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







