नेवासा : ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून अध्यात्म, तत्त्वज्ञान आणि जीवनाचे विविध पैलू उलगडत असताना, ‘ज्ञानेश्वरी चिंतन’ या दोन ग्रंथांच्या माध्यमातून ज्ञानेश्वरीचे विविध पैलू तसेच संत वाङ्मयाच्या अमृताचे वाटप होणार आहे, असे प्रतिपादन देवगड देवस्थानचे भास्करगिरी महाराज यांनी केले.
ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे रचनास्थान आणि संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींची कर्मभूमी असलेल्या पावन नेवासानगरीत रविवार, दि. २३ ऑगस्ट रोजी संत-महंतांच्या उपस्थितीत ‘श्री ज्ञानेश्वरी चिंतन – खंड १ : तत्त्वज्ञान प्रबोध’ आणि ‘खंड २ : जीवन प्रबोध’ या दोन ग्रंथांचा भव्य ग्रंथपूजन सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला.

डॉक्टर अनिल सहस्रबुद्धे आणि डॉक्टर दिलीप धनेश्वर यांनी संचलित केलेल्या या दोन ग्रंथांचे नेवासा येथील पवित्र पैस खांबाच्या पायाशी ठेवून विधिवत ग्रंथपूजन करण्यात आले. देवगड देवस्थानचे भास्करगिरी महाराज, ज्ञानेश्वर देवस्थानचे देविदास महाराज म्हस्के, उद्धव महाराज मंडलिक, योगेश महाराज पवार, गणेश शास्त्री, दिलीप महाराज महाजन तसेच वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ-श्रेष्ठ महाराजांच्या उपस्थितीत आणि प्रांत संचारक नानासाहेब जाधव व श्री ज्ञानेश्वर मंदिर संस्थानचे अध्यक्ष, माजी आमदार पांडुरंग अभंग यांच्या हस्ते या ग्रंथांचे पूजन करण्यात आले.

त्यानंतर पैस खांबासमोरील सभागृहात झालेल्या कार्यक्रमात डॉक्टर अनिल सहस्रबुद्धे व डॉक्टर धनेश्वर तसेच त्यांच्या साधकांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे संतपूजन करण्यात आले. यावेळी या चिंतन ग्रंथांतील लेखांचे लेखन व ग्रंथ सजावट करणारे ओंकार जोशी, विहा पब्लिकेशनचे श्रीपाद कुलकर्णी, मुद्रक-शोधक श्रीकांत जोशी हेही उपस्थित होते.
बदलत्या काळात संत साहित्याचे महत्त्व वाढणार : देविदास महाराज म्हस्के
सदर चिंतन ग्रंथांविषयी बोलताना ज्ञानेश्वर मंदिर देवस्थानचे देविदास महाराज म्हस्के म्हणाले, “संत साहित्य बदलत्या काळामध्ये अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. भावी काळातील सर्व प्रश्नांची उत्तरे ज्ञानेश्वरीमध्ये आहेत. ज्ञानेश्वरीचे वाढलेले महत्त्व पुन्हा एकदा जनमाणसाला संत साहित्याकडे आकर्षित करेल.”

उपनिषद-वेदांतील विचारांचा व्यापक आविष्कार ज्ञानेश्वरीत : गणेश महाराज शास्त्री
गणेश महाराज शास्त्री म्हणाले, “उपनिषद आणि वेदांमध्ये जे नाही ते देखील ज्ञानेश्वरीमध्ये आहे. गीतेवर टीका करण्यापेक्षा भगवंतांचे विचार प्रगट करण्याचे काम ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीद्वारे केले आहे.”
ज्ञानेश्वरीचे चिरंतन चिंतन होत राहणार : उद्धव महाराज मंडलिक
उद्धव महाराज मंडलिक म्हणाले, “ज्ञानेश्वरीचे चिरंतर चिंतन होणार आहे. त्यामुळे या ग्रंथाचे प्रकाशन होताना ज्ञानेश्वर माऊलींनाच मोठा आनंद झाला असेल.”

यावेळी डॉक्टर आचार्य अनिल सहस्रबुद्धे यांनी प्रास्ताविक करून सदर ग्रंथ निर्मितीचा प्रवास उपस्थितांसमोर उलगडला. सूत्रसंचालन सतीश आबा मुळे सर यांनी केले, तर शंकरराव ठोंबरे यांनी आभार मानले. विश्वस्त माऊली शिंदे यांच्या पसायदान ी कार्यक्रमाचे सांगता झाली
संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आणि आनंदोत्सव चॅरिटेबल ट्रस्ट, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. संत-महंत, वारकरी, भाविक तसेच साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्ञानेश्वरीच्या पवित्र भूमीत ग्रंथपूजन, संतपूजन आणि चिंतनाचा झालेला हा त्रिवेणी संगम उपस्थितांसाठी आध्यात्मिक अनुभूती देणारा ठरला.

ज्ञानेश्वरी चिंतनाचे कार्य म्हणजे संतसेवाच : भास्करगिरी महाराज
आनंद उत्सव चॅरिटेबल ट्रस्ट आणि डॉक्टर अनिल सहस्रबुद्धे यांच्या कार्याचे महत्त्व सांगताना भास्करगिरी महाराज म्हणाले, “आम्ही देवदर्शन करणारे किंवा ज्ञानेश्वरीचे भक्त-वाचक आहोत; परंतु डॉक्टर सहस्रबुद्धे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ज्ञानेश्वरीचे चिंतन केल्यामुळे ते आमच्याविषयी मोठे वाटतात.” ज्ञानेश्वरी चिंतनाचे हे महत्त्वपूर्ण कार्य केल्याबद्दल त्यांनी सर्व संतांच्या वतीने डॉक्टर सहस्रबुद्धे यांचे आभार मानले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







